कोल्हापूर : निवृत्त माजी सैनिक असलेल्या सुरक्षारक्षकप्रश्नी गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडे यांनी निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले. १६ तारखेला याबाबतची पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी पक्षकारांनी पुढील तारीख मागितली नाही तर ही अंतिम सुनावणी होऊन पुढील आठ ते दहा दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अहवाल सादर केला जाईल.
अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २००६ ला १६ निवृत्त माजी सैनिकांना सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी कामगार कायद्याप्रमाणे वेतन मिळावा, त्यांना कायम करावे व इतक्या वर्षांच्या फरकाची रक्कम द्यावी अशी मागणी करून न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यापैकी १० सुरक्षारक्षकांनी तडजोड केली, मात्र सहा सुरक्षारक्षकांनी त्याला नकार देत न्यायालयातील लढा कायम ठेवला. कामगार न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत सगळीकडे त्यांच्या बाजूने निकाल लागूनही समितीने त्यांच्या मागण्यांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची नियुक्ती केली असून, या प्रकरणाची तिसरी सुनावणी गुरुवारी झाली.
यावेळी समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी समितीने या प्रकरणात केलेले आदेश, लेखा जबाब, तडजोडी, निकाल याबाबतची माहिती दिली. यावेळी कांबळे यांनी काही आदेश व कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील सुनावणी पुढच्या गुरुवारी (दि. १६) होणार आहे. या सुनावणीत दोन्ही बाजूंनी कोणत्याही कारणासाठी मुदत मागितली नाही तर ही अंतिम सुनावणी असेल. यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल.
---