इचलकरंजी : राज्यातील सर्व यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत मिळवण्यासाठीचा ऑनलाइन अर्ज भरण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी येथील विविध यंत्रमागधारक संघटनांनी केली आहे. या मागणीची निवेदनेही दिली आहेत. त्यावेळीपासून प्रयत्न सुरू असले, तरी आजतागायत मुदत वाढल्याचा किंवा ही प्रक्रिया रद्द झाल्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे अर्ज भरण्याबाबतचा गोंधळ कायम आहे.
दरम्यान, सोमवारी येथील यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या शिष्टमंडळाने या मागणीसाठी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवासस्थानी भेट घेत निवेदन दिले. त्या वेळी झालेल्या चर्चेत, अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मे आहे, ती प्रथम मुदत वाढवून घेतो. मुदत वाढल्यानंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याशी बोलून ही प्रक्रिया रद्द करून घेण्याचे प्रयत्न करतो, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.