लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या मतदार याद्यांच्या कट ऑफ डेटवर सोमवारी औरंगाबाद खंडपीठात अंतिम सुनावणी झाली, याबाबतचा निकाल उद्या, बुधवारी दिला जाणार असल्याचे समजते. यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने संस्थांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली खरी, मात्र मतदार याद्यांच्या कट ऑफ डेटचा पेच निर्माण झाला आहे. वर्षापूर्वी तयार झालेल्या यादीवर निवडणुका घेण्यावर हरकत घेत कट ऑफ डेट २०१८ ग्राह्य धरण्यात येऊन नव्याने ठराव मागवण्यात यावेत यासाठी बीड, परभणी, नांदेड जिल्हा बँकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी अंतिम सुनावणी झाली, याचिकाकर्ते व शासनाची बाजू ऐकून घेतली. यावर उद्या, बुधवारी निकाल दिला जाणार आहे. या निकालाचा परिणाम ‘गोकुळ’, जिल्हा बँकेसह सर्वच सहकारी संस्थांच्या मतदार याद्यांवर होणार आहे. संस्था सभासदांसाठी निवडणुकीच्या अगोदर तीन वर्षे तर व्यक्ती सभासदांसाठी दोन वर्षे पकडून यादी अंतिम केली जाते. त्याचबराेबर २०१७ ला काही शेतकरी थकबाकीदार होते. मात्र, नंतर राज्य शासनाच्या कर्जमाफीत ते कर्जमुक्त झाल्याने त्यांचाही पात्र यादीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे.