लोकमत न्यूज नेटवर्क
कबनूर : येथील जमिनी वर्ग एक करण्याबाबत महसूल विभागाने पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे कबनूर गावच्या जमिनी वर्ग १ करण्याबाबत बैठक बोलावली होती. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्यासमक्ष पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम. पाटील, माजी जि.प. सदस्य जयकुमार कोले, अशोक पाटील यांनी प्रास्तावित विषयाची माहिती दिली.
कबनूर गाव इचलकरंजी औद्योगिकनगरीजवळ असल्यामुळे गावामध्ये येणारे उद्योजक तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपले व्यवसाय तसेच कामगार वर्ग निवासासाठी जमीन खरेदी करत आहेत. त्यांना सदर जमिनी इनामी असून याबाबत नजराणा रक्कम शासनाकडे जमा करण्याचा सल्ला दिला जातो. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सात/बारावर भोगवटादार वर्ग १ नोंद असूनही भोगवटादार वर्ग २ होण्यासाठी नियमानुसार नजराणा रक्कम भरावी लागते. त्यामुळे अनेक व्यवहार अपूर्ण आहेत याचा भुर्दंड सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
इचलकरंजीचे प्रांताधिकारी व हातकणंगलेच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची माहिती घेऊन हे प्रकरण आपल्याकडे पाठवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटदार १ करण्यात येऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मंत्री मुश्रीफ व प्रभारी जिल्हाधिकारी पवार यांच्याकडे केली. पंधरा दिवसांत महसूल विभागाने कबनूर जमिनी वर्ग १ करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी सूचना केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, पंचगंगेचे संचालक प्रमोद पाटील, बी.डी. पाटील, सुधाकर झोले, महावीर लिगाडे, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, आदी उपस्थित होते.