मांजर्डे : इतर पक्षांतून महायुतीत येणाऱ्यांवर नियंत्रण व लक्ष ठेवले आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवले तरच आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता येईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आरवडे (ता. तासगाव) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.आरवडे येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले की, लोकसभेत मोदी लाटेवर स्वार होऊन आज अनेकजण महायुतीत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा दलबदलूंवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर राज्यात महायुतीची सत्ता येणार नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यात यावी. राज्यातील जनतेला काँग्रेस आघाडीने फसवले आहे. सहकार मोडीत काढण्याचे पाप केले आहे. ७००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. शरद पवार शेतकऱ्यांऐवजी कारखानदार, घोटाळेबहाद्दरांना संरक्षण देऊन राजकारण करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीची वाताहत होईल. महायुतीत सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या व प्रामाणिकपणे पक्षाचा झेंडा घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय चर्चेतून घेऊ.महेश खराडे म्हणाले की, गृहमंत्री पाटील यांनी विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना करताना स्वत:च्या मतदार संघातील काम लवकर केले. परंतु शेजारच्या मतदार संघातील काम मागे ठेवून विसापूर भागातील जनतेवर अन्याय केला आहे. संदीप राजोबा, सयाजी मोरे, बी. जी. पाटील, प्राचार्य प्रकाश जाधव, जोतिराम जाधव यांचीही भाषणे झाली. यावेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, मिरज तालुकाध्यक्ष महावीर पाटील, जयकुमार कोले, हरिष खराडे, पोपट मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)एका व्यासपीठावर या...खा. पाटील म्हणाले की, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी २५ वर्षे भुलवून निवडणुका लढविल्या आहेत. ज्या जनतेने जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले, त्या जनतेवर त्यांनी मानसिक गुलामगिरी लादली आहे. विसापूर-पुणदी योजना, तासगाव कारखान्याबाबत त्यांनी एका व्यासपीठावर येऊन चर्चा करावी.
दलबदलूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यकच
By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST