अंजर अथणीकर / सांगली सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्याने आगामी दीड महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी या निवडणुकीतही जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच फॉर्म्युला वापरण्याची शक्यता राजकीत वर्तुळातून व्यक्त होत आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पाच गटामध्ये होते. त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदार संघामधून २२८६ व हमाल, तोलाईदार मतदार संघातून १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदार संघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी-विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक नियुक्त आहेत. येत्या १५ मेपर्यंत अंतिम मतदारयादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी विकास सोसायट्यांचे संचालक सरसकट १७ वरून १३ करण्यात आल्याने मतदार संख्येतही घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार जत तालुक्यातील आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात याचा विस्तार आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार हे एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. मात्र या पॅनेलचा कालावधी पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. गेल्या अडीच वर्षापासून या संस्थेवर प्रशासक आहे. इतक्या मोठ्या कालावधीसाठी पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. गत निवडणुकीत राजकीय वैमनस्य असले तरी, प्रशासक नियुक्तीच्या अडीच वर्षाच्या काळात बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या मदन पाटील गटाची एकी झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील एकत्र आले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्यामुळे त्यांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न झाले आहेत. यामुळे काँग्रेसमधील पतंगराव कदम गट बाजूला पडला आहे. जिल्हा बँकेचा हा फॉर्म्युला बाजार समितीतही वापरला जाण्याची शक्यता आहे. पतंगराव कदम आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची वेगळी आघाडी होण्याची शक्यता असल्याचे माजी संचालकांकडून बोलले जात आहे. या निवडणुकीतही कदम गटाने ताकदीने उतरण्याचा इशारा दिल्याने, ही निवडणूक चुरशीने होण्याची शक्यता आहे. निवडणूक आता तोंडावर आल्याने राजकीय जुळवाजुळवीला वेग आला आहे.
बाजार समितीमध्ये ‘डीसीसी’चाच फॉर्म्युला
By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST