पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दत्त (दालमिया भारत शुगर कंपनी) साखर कारखान्याच्या वजनकाट्याची भरारी पथकाने भेट देऊन तपासणी केली. कारखान्याचा वजनकाटा बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारीपथकाचे प्रमुख कोल्हापूर प्रथम विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग १ साखर यु. आर. कुंभार यांनी दिला.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासण्यासाठी भरारीपथकाची नेमणूक करून, काटा तपासणीचा आदेश दिले आहेत. यापैकी प्रथम लेखापरीक्षक सहकारी संस्था यु. आर. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यमापन निरीक्षक ए. के. महाजन आणि पन्हाळा पोलीस काॅन्स्टेबल बी. डी. कांबळे यांनी अचानक दत्त दालमिया साखर कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची तपासणी केली. यावेळी वजनकाट्यावर वजन करुन गव्हाणीकडे गेलेल्या ऊस भरलेल्या सात वाहनांची वजन पावती ताब्यात घेऊन त्यांचे पुन्हा वजन केले असता, केलेल्या वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही.
याशिवाय २० किलोप्रमाणे चार हजार किलो वजनाची प्रमाणित वजनाने काट्यावर ठेवून पुन्हा तपासणी केली. यातही सर्व वजनकाटे सदोष असल्याची माहिती यु. आर. कुंभार यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक वाहनचालकाला वजन दर्शविणारे दर्शक केबिन बाहेर लावले आहेत. उसाच्या भर व रिकाम्या वाहनांचे एकाच वजनकाट्यावर वजन होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून दत्त दालमिया कारखान्याचा वजनकाटा बिनचूक असल्याचे प्रशस्तीपत्र अहवाल भरारीपथकाने कारखान्याला दिला. यावेळी जनरल मॅनेजर केन श्रीधर गोसावी, वरिष्ठ मॅनेजर (केन) संग्राम पाटील, केनयार्ड सुपरवायझर दिलीप पाटील, शेतकरी बाजीराव कदम, अजित शेलार, आर. के. संकपाळ, अशोक शेवाळे, वाहतूकदार, काटा कर्मचारी उपस्थित होते.