लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमुळे दुर्दैवाने दृष्टी अल्प झाली. या शारीरिक अडचणीवर मात करीत बी. टेक. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले. या शिक्षणादरम्यान काही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेऊन करिअर आणि देशसेवा करण्याचे दारवाड (ता. भुदरगड) येथील आनंद अशोक पाटील यांनी ठरविले. त्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी सुरू केली. दिवसातील १५ तास व्हिडिओ, ऑडिओ लेक्चर ऐकून तयार करीत यूपीएससी परीक्षेत देशात ३२५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश मिळविले आहे.
‘बीटेक’ची पदवी मिळाल्यानंतर आनंद यांनी सन २०१७ पासून ‘यूपीएससी’ची तयारी सुरू केली. अल्प दृष्टीमुळे भिंगाची काच घेऊन पुस्तके, नोटस्चे वाचन करावे लागत होते. त्यामुळे योग्य स्वरूपात अभ्यास होत नव्हता. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी यू-ट्यूब, काही ॲपची मदत घेतली. त्याद्वारे व्हिडिओ, ऑडिओ लेक्चर ऐकून त्यांनी अभ्यास सुरू केला. रोज १५ तास ते अभ्यास करायचे. भिंगाची काच घेऊन प्रश्नपत्रिका वाचून ते सोडवायचे. पहिल्यांदा मुलाखतीत, तर दुसऱ्यांदा मुख्य परीक्षेत त्यांना यशाने हुलकावणी दिली; पण त्यांनी जिद्द सोडली नाही. तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा देण्यासाठी पुन्हा जोमाने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यास केला. त्याच्या जोरावर यंदा या परीक्षेत बाजी मारत आपले ध्येय गाठले. त्यांची यशकथा तरुणाईला प्रेरणादायी ठरणारी आहे.
क्षेत्र कोणतेही असू दे ‘बेस्ट’ करा
करिअरचे क्षेत्र कोणतेही असू दे त्यामध्ये ‘बेस्ट’ काम करा, तुम्हाला आपोआप यश मिळेल. जिद्द, सातत्य आणि प्रामाणिकपणे प्रयत्न याच्या जोरावर यूपीएससीत उत्तीर्ण झालो. खूप आनंद वाटत आहे. आई-वडील, बहिणी, शिक्षकांच्या पाठबळामुळे यश मिळविता आले. मिळेल त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे देशसेवा करणार आहे. माझ्यासारख्या दिव्यांग बांधवांचे करिअर घडविण्यासाठी योगदान देणार असल्याची प्रतिक्रिया आनंद यांनी व्यक्त केली.
आई-वडील, बहिणीची मोठी साथ
माझी आई सुनंदा गृहिणी, तर वडील अशोक पाटील हे सिंचन विभागातील निवृत्त शाखा अभियंता आहेत. नेहा आणि शीतल या बहिणी आहेत. ‘यूपीएससी’ची तयारी करण्यात त्यांनी मला मोठे पाठबळ दिले. पुस्तके, नोटस् वाचणे मला अडचणीचे ठरायचे. त्यावर नवीन पुस्तकांच्या मोठ्या झेरॉक्स करून देणे. काही वेळा वाचून दाखविणे, अशी मदत या दोन्ही बहिणींनी केली. कुटुंबीयांची साथ या परीक्षेत यशासाठी महत्त्वाची ठरल्याचे आनंद यांनी सांगितले.
केवळ काळा फळा दिसायचा
५० टक्के दृष्टी असल्याने वर्गात बसले, तर केवळ काळा फळा दिसायचा, त्यावर काय लिहिले आहे ते समजत नव्हते. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी मदतनीस घेतला. मात्र, त्यात वेळ अधिक जायचा. हवा तसा समन्वय साधता येत नव्हता. पुस्तकेही नीट वाचता येत नव्हती. अशा अडचणींवर मात करीत आनंद यांनी त्यांचे ध्येय गाठले आहे.