रमेश वारके - बोरवडे -कागल तालुक्यातील बोरवडे व उंदरवाडी येथील गावांच्या कॅनॉलवर असणाऱ्या साकवांची दुरवस्था झाली आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या साकवावरील वाहतूक मृत्यूचा सापळा बनली आहे. अनेक अपघात होऊनही पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत आहे.कॅनॉल दुथडी वाहू लागल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच संबंधित खाते जागे होणार का? असा संतप्त सवाल बोरवडे-उंदरवाडी येथील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.बोरवडे येथील पठार नावाच्या साठेमाळवाडी बाजूस असणाऱ्या कॅनॉलवर २२ वर्षांपूर्वी साकव उभा करण्यात आला आहे. निपाणी-राधानगरी रस्त्यावरून पठाराकडे पाणंद गेली आहे. संबंधित साकव हा पाणंदीच्या समोर उभा करणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे खात्याने या पाणंदीच्या उजव्या बाजूस पन्नास मीटर अंतरावर हा साकव उभा करणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे खात्याने या पाणंदीच्या उजव्या बाजूस पन्नास मीटर अंतरावर हा साकव उभा केला आहे. या साकवावरून शेतकरी व जनावरांची नेहमी वर्दळ असते. अशातच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस तोडणीसाठी या दोन्ही साकवावरून शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस हे दोन्ही साकव अडचणीचे होत आहेत.साकवाच्या दोन्ही बाजूच्या आधारासाठी असणारे संरक्षक कठडे (सळ्या) चोरीला गेले असून, वाहतुकीदरम्यान हा साकव हलतो. तसेच साकवावर वाहतुकीसाठी खाली टाकण्यात आलेला पत्रा गंजून तो कमकुवत झाल्याने सडत चालला आहे. त्यामुळे जनावरांचे पाय अडकून अपघात झाले आहेत.उंदरवाडी येथील साकवाचीही मोठी दुरवस्था झाली आहे. या साकवावर अनेक अपघात घडले आहेत. दुचाकींसह-चालक पडणे, फाटलेल्या पत्र्यात पाय अडकून जखमा होणे, अशा घटना वारंवार घडल्या आहेत. भीतीपोटी स्त्रिया व लहान मुलांनी साकवावरून प्रवास करणे बंद केले आहे. बोरवडे व उंदरवाडी येथील साकव दुरुस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितपणा यावा यासाठी शिवसेनेच्यावतीने आंदोलन केले होते. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित साकवासंदर्भात आश्वासन दिले होते. संबंधित खात्याने याकडे लक्ष दिले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
उंदरवाडीतील साकव धोकादायक
By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST