आंबा : शाहूवाडीच्या उत्तर सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कांडवण धरणाच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराला आडवी भेग गेल्याने धरणाला धोका निर्माण झाला आहे. या डोंगरापासून धरणाच्या पायथ्याकडे एक किलोमीटरवर वसलेल्या आगलावेवाडी व पुढे एक किलोमीटर अशी दोन किलोमीटर डोंगराला आडवी भेग पडली आहे.
कांडवण धरणाच्या पायथ्याशी व भेग पडलेल्या डोंगरावर असलेल्या चाळीस घरांच्या आगलावेवाडीला यामुळे भूस्खलनाचा धोका आहे. येथील २०५ ग्रामस्थ २३ जुलैपासून भीतीमुळे कांडवण गावात मुक्कामी आहेत. या वाडीला बुधवारी तहसीलदार गुरू बिराजदार यांनी भेट देऊन वस्ती हलविण्याचे आदेश दिले आहेत. भूगर्भतज्ज्ञांना बोलावून डोंगरांची भेग दाखवली जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे बिराजदार यांनी सांगितल्याचे सुभाष आगलावे यांनी सांगितले. धरणातील सांडव्यातून येणारे पाणी छोट्या पुलाखालून जात असून, हा पूल ओलांडून डोंगरावरील आगलावेवाडीतील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत. सात दिवसांपासून वीज नसल्याने व मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे कोणाशीही संपर्क झालेला नाही. डोंगरावरच्या वस्तीवर दहा फुटावरच भेग गेल्याचे सभापती विजय खोत व उपसरपंच शिवाजी चांदे यांनी सांगितले. पावसात तात्पुरते स्थलांतर करण्याबरोबरच येथून अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी उपसरपंच चांदे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याकडे केली. माजी आमदार सत्यजित पाटील व सभापती विजय खोत यांनी कानसा खोऱ्याची पाहणी केली व मुख्यमंत्र्यांकडे भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी विशेष निधी देण्याची लेखी मागणी केली आहे.
२९ कांडवण धरण भेग
फोटो ओळी : कांडवण धरणाखालील आगलावेवाडीच्या डोंगरावर भेग पडली आहे.