इचलकरंजी : येथील नगरपालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने सुरू केलेले उपोषण बुधवारी तिसऱ्या दिवशी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या लेखी आश्वासनानंतर एक महिन्याची मुदत देऊन स्थगित केले. दरम्यान, महिन्यात कोणतीही सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला.या ढिम्म व बेजबाबदार प्रशासना विरोधात २४ आॅगस्टपासून उपोषण सुरू केले होते. त्यामध्ये दिलीप माणगावकर, अभिजित पटवा, इराण्णा सिंहासने, प्रसाद दामले हे उपोषणास बसले होते. मंचने केलेल्या मागण्यांबाबत बुधवारी कोणत्या तक्रारीसंदर्भात काय कारवाई करणार, याबाबतचे लेखी आश्वासन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मंचने एक महिन्यासाठी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. यावेळी गावभागचे पोलीस निरीक्षक शिवाजी कणसे, अजित जाधव, धोंडिराम जावळे, बाळ महाराज, आदींसह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)लेखी तक्रारीनगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभारामध्ये बोगस नळजोडण्या, खतांची चोरी, कचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम, यांसह अनेक गंभीर प्रश्नांबाबत इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने अनेकवेळा नगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या लोकअदालतीमध्येही अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. तरीही सर्व प्रश्न ‘जैसे थे’ च्या स्थितीत होते.
आश्वासनानंतर उपोषण स्थगित नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार : इचलकरंजी नागरिक मंचची एक महिन्याची मुदत; पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन
By admin | Updated: August 27, 2015 00:03 IST