कोल्हापूर : विभागीय आयुक्तांनी कोल्हापुरात कोरोनाबाबत तातडीची बैठक घेऊन रुग्णांची आणि मृत्यूची संख्या याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी मंगळवारी केली.
कोल्हापूर शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. ही गंभीर बाब आहे. लस आणि रेमडेसिविरचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्याला अनेक कारणे आहेत हे आम्ही समजू शकतो, परंतु प्रशासकीय स्तरावर जे नियोजन होणे गरजेचे आहे, ते होत नसल्याचे उदाहरण म्हणजे शहरात लसीकरणाच्या ठिकाणी होत असलेली गर्दी आहे. त्याला पूर्णपणे महापालिका जबाबदार आहे. प्रशासकीय स्तरावर नसलेला समन्वयाचा अभाव आणि काही प्रमाणात अनास्था कारणीभूत आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांना विनंती आहे की, त्यांनी कोल्हापूरमध्ये तातडीची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. अन्यथा कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त कसा होईल याकडे सर्वांनी मिळून लक्ष द्यावे, अशी विनंती संजय पवार यांनी केली आहे.