कोल्हापूर : गेल्या साडेतीन महिन्यांतील सर्वांत कमी कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या गुरुवारी नोंदवण्यात आली. जिल्ह्यात नवे १७६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. ३९८ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या २३०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्व निर्बंध हटल्यानंतरही ही रुग्णसंख्या कमी येत असल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.
कोल्हापूर शहरामध्ये ५६, त्याखालोखाल करवीर तालुक्यात ४५, तर हातकणंगले तालुक्यात २३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृतांमध्ये शहापूर, इचलकरंजी, मोरेवाडी, ता. करवीर, जयसिंगपूर, ता. शिरोळ येथील तिघांचा समावेश आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत ही सर्वांत कमी मृत्यृसंख्या आहे.
जरी कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असली तरी नागरिकांनी बेफिकीर राहू नये. प्रतिबंधासाठीच्या सर्व उपायांची अंमलबजावणी सुरू ठेवावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
तालुकावार मृत्यू
इचलकरंजी ०१
करवीर ०१
मोरेवाडी
शिरोळ ०१
जयसिंगपूर
चौकट
चार तालुक्यांमध्ये ० रुग्ण
गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या तालुक्यांमध्ये ५० हून अधिक कोरोना रुग्ण नोंदवण्यात येत होते अशा चार तालुक्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. आजरा, भुदरगड, गडहिंग्लज आणि गगनबावडा या तालुक्यांत ० रुग्णांची नोंद झाली आहे, तर चंदगड तालुक्यात एक, राधानगरी तालुक्यात दोन इतकी कमी संख्या आली आहे.