शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. कडवी, कासारी नदीवरील सोळा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदी काठच्या गावांना तहसील प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे .
मानोली, बर्की, पालेश्वर, कांडवण, गेळवडे , कासारी धरण व जंगलव्याप्त भागात संततधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे कडवी, कासारी, वारणा , शाळी या नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे कोपार्डे, सवते, सरूड, पाटणे, पेरिड, सावर्ड, यवलूज, कांटे, करंजपेण, पेडांखळे, बाजार भोगाव, वालोली, पुनाळ, तिरफण, ठाणे, आळवे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात पाऊस जोरदार पडत असल्यामुळे कडवी धरण ६० टक्के भरले आहे तर कासारी धरण ७३ टक्के भरले आहे . कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर ते आंबा या रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे वाहनचालकांना वाहन हाकताना तारेवरची कसरत करणे भाग पडत आहे. तालूक्यातील धबधबे ओसंडून कोसळू लागले आहेत. महसूल प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मलकापूर शहरातील पूरग्रस्त भागात मलकापूर नगर परिषदेच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.