कोल्हापूर : येथील शंभर एकर जागेमध्ये मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात सध्या कार्यान्वित असलेल्या आयटी उद्योगाची मागविलेली माहिती आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्यावतीने सोमवारी सायंकाळी त्यांना सादर करण्यात आली. संभापूर-कासारवाडी दरम्यानच्या जागेमध्ये नवा पार्क करण्याचा उद्योगमंत्री देसाई यांचा विचार आहे. त्याबाबत आज, मंगळवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री देसाई यांनी कोल्हापुरातील स्थानिक आयटी उद्योगाबाबतची माहिती मागविली. त्यानुसार आयटी असोसिएशनची स्थापना, त्यामागील उद्देश, जिल्हा आयटी धोरण, स्थानिक आयटी पार्क होण्यासाठी असोसिएशनने केलेला पाठपुरावा, त्यावर महानगरपालिकेने आरक्षित केलेली जागा आणि याबाबत आतापर्यंत झालेली कार्यवाही, आदी स्वरूपातील माहिती असोसिएशनने सादर केली आहे. कोल्हापुरात मोठा पार्क होणार असेल, तर चांगले आहे. मात्र, स्थानिक आयटी पार्क होण्याचा प्रश्नही लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी केली असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम सुर्वे यांनी दिली.
दरम्यान, नवा आयटी पार्क जिल्ह्यातील संभापूर ते कासारवाडी दरम्यानच्या शंभर एकर जागेत करण्याचा विचार उद्योगमंत्री देसाई यांचा आहे. या पार्कसाठी जागा देण्याची तयारी तेथील जागा मालकांनी केली आहे. मुंबईतील बैठक झाल्यानंतर आठवड्याभरात जागेची पाहणी करण्यासाठी उद्योग विभागातून समिती येण्याची शक्यता आहे.
चौकट
स्थानिक उद्योजकांची मदत घ्यावी
जिल्ह्यात मोठ्या आयटी कंपन्या आल्या, तर त्यामुळे स्थानिक आयटी उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होतील. बाहेरून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या कंपन्यांना त्यांनी आऊट सोर्सिंगसाठी येथील स्थानिक उद्योजकांची मदत घ्यावी. त्याबाबतची अट त्यांना सरकारने घालावी. आयटी उद्योगासाठी आवश्यक असणारी इको सिस्टीम विकसित करण्यावरही सरकारने भर द्यावा, अशी मागणी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी केली.