लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दिल्लीच्या सहा सीमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या शांततापूर्ण सत्याग्रहास उद्या सोमवारी २७ सप्टेंबरला दहा महिने पूर्ण होत आहेत. यानिमित्त संयुक्त शेतकरी, कामगार मोर्चाच्या वतीने ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
केंद्र सरकारने २२ जानेवारी २०२१ नंतर शेतकऱ्यांशी चर्चा करायला नकार दिला आहे. उलट हे आंदोलन हिंसक पद्धतीने मोडून काढायचा प्रयत्न सुरू आहे. ५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे महापंचायतीची सभा झाली. त्यात जमलेल्या १० लाख शेतकरी कामगारांनी भाजपला विरोध केला आहे. त्याचा दुसरा टप्पा म्हणजे हा बंद होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, सर्व प्रकारचे व्यावसायिक व सर्व घटकांनी भाग घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.