राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरलोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत आघाडी होणार असल्याने जिल्ह्यात कॉँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मोठ्या मेहनतीने जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बांधलेली कॉँग्रेस नेत्यांची मोट विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा बॅँक, ‘गोकुळ’सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉँग्रेससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक तालुक्यात लक्ष केंद्रित करीत नेतेमंडळींनी कॉँग्रेसचा गट मजबूत केला होता. विशेषत: कागल, चंदगड, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यांत त्यांनी विशेष लक्ष देत सर्व नेत्यांना एकत्र बांधण्याचे काम केले.राधानगरी-भुदरगडमध्ये बजरंग देसाई, दिनकरराव जाधव, प्रकाश आबिटकर, विजयसिंह मोरे, अरुण डोंगळे या सर्व नेत्यांना एकत्रित आणले. येथे ‘गोकुळ,’ जिल्हा परिषदेमधील पद व विधानसभा यांची वाटणी करून ही जागा सुरक्षित केली होती. चंदगडमध्ये भरमूअण्णा पाटील व नरसिंगराव पाटील यांना एकत्र आणत राष्ट्रवादीला रोखले. येथेही याच सूत्राप्रमाणे विधानसभेचा उमेदवार ठरला होता. शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील व कर्णसिंह गायकवाड यांचे मनोमिलन केले. येथे कर्णसिंह गायकवाड गटाला ‘गोकुळ’ देऊन सत्यजित पाटील यांना कॉँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू होता. हातकणंगलेमध्ये जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक हे नेते एकत्र आले. त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसला. कॉँग्रेसने तब्बल ३१ जागा जिंकत ‘स्वाभिमानी’च्या साथीने सत्ता प्रस्थापित केली. यामध्ये याच तालुक्याचे योगदान मोठे होते. तालुकांतर्गत नेत्यांचे मतभेद असले तरी त्यांना एकत्रित बांधण्याचे कौशल्य नेत्यांनी दाखवले होते. पक्षाची बांधलेली मोट विस्कटू नये, यासाठी आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे कोल्हापूरची जागा कॉँग्रेसलाच मिळावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. ही जागा कॉँग्रेसला मिळाली असती तर खासदार सदाशिवराव मंडलिक बाहेर पडले नसते; पण राष्ट्रवादीने स्वत: बेरजेचे राजकारण करीत कॉँग्रेसमध्ये वजाबाकी केली. विधानसभा निवडणुकीतही आघाडीवरच चर्चा सुरू असल्याने अस्वस्थ कॉँग्रेसचे नेते शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. मतदारसंघ काँग्रेसला मिळणार नसल्याने प्रकाश आबिटकर, संजय घाटगे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. त्यांच्यापाठोपाठ नरसिंग पाटील हेही अस्वस्थ आहेत. गेली पाच वर्षे मनाने कॉँग्रेससोबत असलेले सत्यजित पाटील यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. याचा मोठा फटका कॉँग्रेसला बसणार आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी जरी केली, तरी आगामी काळात सहकारी संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसच एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. हे नेते बाहेर गेल्याने कॉँग्रेससमोरील अडचणी वाढणार आहेत.
आघाडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसची घडी विस्कटली
By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST