कोल्हापूर : शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेमार्फत अमृत योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी ड्रेनेज व चॅनलची कामे सुरू आहेत. त्यासाठी मुख्य रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. खोदकाम केलेले रस्ते लॉकडाऊनपूर्वी पाईपलाईन टाकून पुन्हा पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.
कोल्हापुरात सायबर चौक ते माउली पुतळा, बिंदू चौक ते शाहू टॉकीज, धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, आदी ठिकाणी अमृत योजनेतून पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे कामाबरोबरच ड्रेनेज व चॅनलचीही कामे सुरू आहेत. यासाठी प्रमुख रस्ते खोदण्यात आले आहेत. ही कामे लाॅकडाऊनमुळे बंद आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळातच हे काम पूर्ण करावे, जेणेकरून लाॅकडाऊन उठल्यानंतर या कामांना रहदारीचा अडथळा होणार नाही. तसेच ही कामे चालू असताना रहदारीचा प्रश्नही उद्भवणार नाही आणि नागरिकांनाही त्याचा त्रास होणार नाही. यामुळे सर्व कामे लाॅकडाऊनच्या काळातच व्हावीत, अशी मागणी कोल्हापुरातील पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने, आरती वाळके, स्मिता हराळे, गीता डाकवे, मंगल आंबरे, नंदा चौगले, गीता भोसले, शर्मिला भोसले यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.