कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपनीकडून बेकायदेशीररित्या होत असलेल्या कर्जवसुली विरोधात नागरिकांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे यावे. पोलिसांकडून त्याची दखल घेतली जात नसेल तर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी केले. अशा कंपन्यांसोबत करार करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून केल्या जात असलेल्या बेकायदेशीररित्या कर्जवसुली विरोधात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, हा विषय बँकिंग आणि अर्थकारणाशी निगडित असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार रिझर्व्ह बँकेचे आहेत. शेवटी हा नागरिक आणि कंपनी या दोन खासगी स्तरावर झालेला हा निर्णय आहे. जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही रिझर्व्ह बँकेला याबाबतचा अहवाल व नागरिकांच्या भावना कळवू शकतो. काही दिवसांपूर्वी माझी रिझर्व्ह बँकेच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यांना सविस्तर अहवाल पाठवण्यात आला असून याविषयात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडून निर्देश येईपर्यंत ठोस निर्णय घेता येणार नाही. मात्र तोपर्यंत आम्ही सर्व अग्रणी बँकेचे व्यवस्थापकांना पत्राद्वारे शासकीय नियमानुसारच फायनान्स कंपन्यांची कर्जाची वसुली करावी, असे कळवले आहे.पण बेकायदेशीर पद्धतीने वसुली हा गुन्हा आहे, असे प्रकार घडत असल्यास नागरिकांनी पोलिसात तक्रार करण्यासाठी पुढे यावे.
--
नागरिकांची आणि कंपन्यांचीही जबाबदारी
मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेताना नागरिकांनी करारातील सर्व अटी शर्ती वाचणे गरजेचे आहे. कारण त्याचा आधार घेऊन वसुली केली जाते. त्यामुळे आपण कर्जाची ही रक्कम फेडू शकतो का याचा विचार करून कर्ज घ्यावे. करारपत्र वाचावे. कंपन्यांनीदेखील समोरच्या व्यक्तीच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून तेवढीच रक्कम द्यावी. भरमसाठ रकमेचे कर्ज द्यायचे आणि नंतर वसुलीसाठी वेठीला धरायचे असे प्रकार होऊ नयेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले.