इचलकरंजी : गत काही वर्षे संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करीत असलेल्या यंत्रमाग व्यवसायाचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायाला प्रति कारखान्याऐवजी प्रति यंत्रमाग नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली.
निवेदनात, साध्या यंत्रमागासाठी २० हजार रुपये आणि ऑटोलूमला त्या-त्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. या उद्योगातून दरवर्षी शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दिला जातो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. आता पुन्हा महापुराचे संकट उद्भवले असून, पूरग्रस्त यंत्रमाग कारखान्यांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसान भरपाई प्रति कारखाना न देता प्रति यंत्रमाग मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.