तुरंबे : तळाशी (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायत निवडणूक दोन आघाडींत चुरशीची होत असून, येथील प्रभाग क्रमांक दोन हा लक्षवेधी ठरला आहे. या प्रभागात काटाजोड लढत होत आहे. शिवसेना आघाडीच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची आघाडी आहे.
शिवसेनेच्या ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव (गुरुजी) करीत आहेत, तर विरोधी श्री गहिनीनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे नेतृत्व यशवंत ऱ्हाटोळ, हंबीरराव जाधव, संभाजी जाधव, दिलीप खाडे, एम. बी. चव्हाण करीत आहेत. तीन प्रभाग असून, जागा नऊ आहेत. २०३१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गेल्या ४८ वर्षांपासून म्हणजे १९७२पासून मारुतराव जाधव यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. परंतु येथे दोन्ही गटाचा टोकाचा संघर्ष आजही आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला पाच जागा तर विरोधी आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या. सत्तारूढ गटाचे उमेदवार सुनिता सुतार, साऊताई गाडेकर ,रेखा राऊत, भास्कर जाधव, दिलीप भांदीगरे, संजीवनी सावरतकर, सदाशिव चव्हाण ,वर्षाराणी खाडे ,गणेश कांबळे तर विरोधी आघाडीच्या उमेदवारात वैशाली -हाटोळ, स्वाती जाधव ,सुलोचना पाटील, तानाजी चव्हाण ,चंद्रकांत जाधव, स्वाती पाडळकर ,करण खाडे ,सुजाता जाधव, एकनाथ कांबळे यांचा समावेश आहेत.