जयसिंगपूर : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण शिरोळ गावातील ३३ गावांत तापू लागले आहे. पहिल्या टप्प्यात सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराचा नारळ फुटला असून भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. ४०१ जागांसाठी ९९४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सोमवारी माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे मंगळवारी बहुतांशी ग्रामपंचायतीतील आघाड्यांनी उमेदवार फिक्स करून प्रचाराचे नारळ फोडले. खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली असून ग्रामदैवताचे दर्शन घेवून प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे गावा-गावात राजकीय वातावरण तापले असून दहा दिवस उमेदवारांना जागते रहो, अशी परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते देखील प्रचारात उतरले आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मकरसंक्रांत असल्याने तिळगुळ घ्या, गोड बोला हा उपक्रम उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात राबविला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आघाड्यांची नावे देखील फिक्स झाली आहेत. सोशल मीडियावरदेखील प्रचाराला वेग आला आहे. एकूणच गुलाल कोणाला लागणार, याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे.
फोटो - ०५०१२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून हलगीच्या निनादात पदयात्रा सुरू झाल्या आहेत.