लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असून ३१ मेपर्यंत निवडणुकीस स्थगिती दिली आहे. याबाबतचा अध्यादेश आज, मंगळवारी निघणार आहे. राज्यातील सुमारे ४० हजार संस्था निवडणुकीस पात्र आहेत.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना काही मुहूर्त सापडत नाही. डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका घेता आलेल्या नाहीत. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, मात्र महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाने निवडणुका मार्च २०२० पर्यंत लांबणीवर टाकल्या. तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जून २०२० पर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या. पुन्हा सप्टेंबर आणि त्यानंतर डिसेंबर २०२० अशी निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबरमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निवडणुका घ्याव्यात, असा मतप्रवाह पुढे आला. त्यातच सार्वत्रिक निवडणुका होत असताना सहकारी संस्थांच्या निवडणुकाच का नको, म्हणून काहीजण न्यायालयात गेले. त्या संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. तोपर्यंत कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्याने पुन्हा ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या.
सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने निवडणुकांना ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जूननंतरही निवडणुकांचे भवितव्य अधांतरीच
कोरोनाची परिस्थिती पाहून जूननंतर निवडणुकीबाबत निर्णय होईल. जरी रुग्णसंख्या कमी झाली तरी, पावसाळा सुरू होत असल्याने अशा कालावधित निवडणुका होणे कठीण आहे. त्यामुळे निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली, तर ऑक्टोबर २०२१ नंतर होऊ शकते.
जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र संस्था...
दूध - १५००
विकास - ९२२
नागरी बँका - २२
पतसंस्था - ५५
साखर कारखाने - ४
जिल्हा बँक - १