कुंभोज : आर.टी.ई.नुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीचे २०,५६७ वर्ग जोडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तथापि, बहुतांश डोंगरवस्तीतील ६० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पाचवीपर्यंत दोन शिक्षक मंजूर आहेत. अशा शाळेत वर्ग पाच आणि शिक्षक दोन, अशा परिस्थितीत शिक्षकांनी शिकवायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करीत पाचवीपर्यंत किमान तीन शिक्षक मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी संघटनेच्यावतीने शासनाकडे केली आहे. आर.टी.ई. कायद्यानुसार पहिली ते पाचवीसाठी ६० विद्यार्थी पटास दोनच शिक्षक मंजूर असल्याने एका शिक्षकाला तीन वर्गांचे अध्यापन करावे लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, म्हणून पहिली ते पाचवीसाठी किमान तीन, तर १६१ विद्यार्थीपटास सहावा शिक्षक मंजूर होणे आवश्यक आहे. शासनाने १५१ पटास मुख्याध्यापक पद मान्य केले असले, तरी शाळेच्या प्रशासकीय कामकाजासाठी पटाची अट न ठेवता पहिली ते सातवी अथवा आठवीपर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक द्यावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर) शासन निर्णयाचे स्वागत चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शाळेत राज्यभर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पाचवी ते आठवीच्या वर्गांना आताच शिक्षक देण्यात येणार असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. नवीन वर्गांसाठी अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करावी, या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे केला होता. शासन निर्णयाचे संघटनेच्यावतीने स्वागत करीत असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.
वर्ग पाच अन् शिक्षक मात्र दोन
By admin | Updated: July 18, 2014 23:24 IST