शिरोळ : शिरोळ ते अर्जुनवाड रस्ता रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यातच रस्त्याची उंची वाढविण्यात येत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. भाजीपाला, ऊस यासह अन्य पिके बाहेर काढण्यासाठी अडचणी येणार आहेत. त्यामुळे रस्त्याची उंची वाढविण्याचे काम तत्काळ बंद करावे, अशी मागणी अन्याय निवारण समितीने केली आहे.
मिरज ते कर्नाटक असा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, अर्जुनवाड ते शिरोळ रस्त्याची उंची वाढविली जात आहे. त्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. रस्त्याची उंची वाढल्यानंतर शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत काम थांबवावे व रस्त्याची उंची वाढवू नये, यासाठी अन्याय निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनाकडे याबाबतचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती प्रतापसिंह पाटील यांनी दिली.