कोल्हापूर/कसबा बावडा : कसबा बावडा येथील महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) बुधवारी झालेल्या क्लोरीन वायूच्या गळतीचा परिणाम ‘एसटीपी’ प्रकल्पाच्या परिसरातील पिकांवरही दिसू लागला आहे. गुरुवारी भेंडी, वांगी, मुळा, घेवडा यांचा भाजीपाला प्लॉट करपू लागल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. अनिरुद्ध रामराव पाटील (रा. पाटील गल्ली, कसबा बावडा) यांची शेती प्लॉटच्या समोरच आहे. शेतात त्यांनी एक महिन्यापूर्वी भेंडी, मुळा, वांगी, घेवडा, आदी भाज्यांच्या रोपांची लावण केली होती. मंगळवारपर्यंत या पिकांवर कोणताही रोग अथवा किडीचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र, वायू गळतीनंतर गुरुवारी सकाळी भाजीपाल्यांवर परिणाम झाल्याचे पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आले. या प्लॉटच्या शेजारी असणाऱ्या उसावर तसेच रस्त्याकडेच्या झुडपांवरही या वायू गळतीचा परिणाम झाल्याचे दिसत होते. तसेच गुरुवारी दिवसभर या परिसरात उग्र वास जाणवत होता. दरम्यान, औद्योगिक सुरक्षा विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली, तर महापालिकेने एसटीपी चालविण्याचा ठेका असलेल्या ‘विश्वा इन्फ्रा’ला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावत अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये, याबाबात योग्य ती व्यवस्था करण्याचे आदेश दिले. ‘एसटीपी’ केंद्रात बुधवारी झालेल्या गळतीमुळे येथील सहा कर्मचारी गुदमरले. पाचजणांवर प्राथमिक उपचार करून बुधवारीच रुग्णालयातून सोडण्यात आले होते, तर फुलेवाडीतील अक्षय मगदूम यास गुरुवारी सकाळी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. महापालिकेच्या जलविभागाने क्लोरीनची ती गळकी टाकी रिकाम्या जागेत नेली. पाण्यात ठेवून त्यावर सोडीयम हायड्रॉक्साईड व कॉस्टिक सोडा टाकण्यात आला. येत्या दोन दिवसांत या गळक्या टाकीतील क्लोरीनचे विभाजन होईल, असे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी सांगितले. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी व निरीक्षण करून हवेतील क्लोरीनच्या प्रमाणाची तपासणी करून अधिक माहितीसाठी हवेतील घटक प्रयोगशाळेत पाठविले.
‘क्लोरीन’ने भाजीपाला करपला
By admin | Updated: July 31, 2015 00:38 IST