कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्पग्रस्तांचे गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्वसन झालेले नाही, त्यांना निर्वाह भत्तादेखील मिळालेला नाही. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी धरणग्रस्त २५ जानेवारीपासून धरणे आंदाेलन करणार असल्याची माहिती जनता दलाचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी मंगळवारी दिली.
ते म्हणाले, गणपती गवंडी (सध्या राहणार पिंपळगाव) यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी गेल्या १२-१५ वर्षांपासून देय जमिनीसह पुनर्वसनाची मागणी केली आहे. मात्र त्यावेळी पुनर्वसन विभागाने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जमीन कब्जा देण्यास टाळाटाळ केली. वारंवार याबाबत विचारणा केल्यानंतर २०१४ मध्ये कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी येथील गट क्र. २११ या जमिनीचा आदेश दिला. त्याचदिवशी शासकीय प्रतिनिधीसह धरणग्रस्त गेले असता, मूळ मालक हायकोर्टात गेल्याचे कारण दाखवून त्यांना परत पाठवण्यात आले. तरी त्यांना निर्वाह भत्ता मिळावा व त्वरित जमीन देण्यात यावी अन्यथा कुटुंबासह ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसतील, असा इशारा देण्यात आला आहे.
--