बुधवारी संपूर्ण देशभर या शेतकरी व कामगारांच्या विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात काळा दिवस पाळण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये कागल तालुक्यातील सिटु अंतर्गत सर्वच संघटना सहभागी झाल्या असल्याची माहिती सिटुचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. शिवाजी मगदूम यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे केले, कामगार हिताचे कायदे रद्द करून मालकधार्जीण संहिता केल्या. त्यामुळे कामगारांचेही वाटोळे लावले आहे. पेट्रोल, डिझेलची भरमसाट दरवाढ करून भारतीय जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. देशात कोरोनासारखा संसर्गजन्य आजार फैलावत असताना देशाचे पंतप्रधान हे निवडणूक प्रचारात दंग होते. त्यामुळे देशातील लाखो लोकांना जीव गमवावा लागला. सार्वजनिक उद्योगाचेे खासगीकरण करून बड्या भांडवलदारांना पोसण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला व देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन केलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाली तरी निर्ढावलेले केंद्र सरकार शेतकरी व कामगारांच्या आंदोलनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आज देशभरातील सर्व कामगार संघटना, सर्व शेतकरी संघटना यांच्यावतीने गावागावांत व संपूर्ण देशभर केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणाचा काळे झेंडे लावून जाहीर निषेध करण्यात येत आहे.