कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शुक्रवारी (दि.१९ ) होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी केली.
यंदा कोरोना महामारीमुळे होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्रित न येता साधेपणांनी शिवजयंती साजरी करणे अपेक्षित आहे. दरवर्षी महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे शिवजयंतीनिमित्त आयोजन केले जाते. परंतु, यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक, आदींचे सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्याऐवजी या कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करावी. प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अथवा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळावा. केवळ शंभर जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानिमित्त रक्तदान, स्वच्छता , कोरोना, मलेरिया, डेंग्यू, आदींबाबत जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.