सातारा : राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या २०१५ मध्ये निवडणुका होत आहेत. त्यातील ९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूक २५ जुलै व ४ आॅगस्ट पर्यंत होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील ७२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका याच कालावधीत होत आहेत. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४८० मतदान केंद्रांपैकी ११५ संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात माहिती देताना राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया म्हणाले, ‘७२६ पैकी १५ गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात केली आहे. २० जुलै हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना कोणती येणारे अडचण तेथेच सोडविली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक अयोगाने वेगळी व्यवस्था केली आहे. आजअखेर जिल्ह्यतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुण्यातील भारती भोसले, उत्तमराव पाटील, पी. एम. कडुसकर, श्रीपती मोरे या चार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ४६० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण १४ हजार ४०४ एकूण कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणी २७ जुलै व ४आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायतीची मतमोजणी ६ आॅगस्टला होईल. दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सहारिया साताऱ्यात आले होते. येथील नियोजन भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अमिष दाखवून मते विकत घेणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर असल्याचे यावेळी या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
निर्भयपणे मतदान करता येणार
By admin | Updated: July 19, 2015 00:39 IST