जयसिंगपूर : लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापाऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सणामुळे चांगल्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने वेळेची मुदत वाढवून सकाळी सात ते अकरा या वेळेत व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी टिना गवळी यांच्याकडे केली.
शहरात सध्या सात ते साडेआठ ही वेळ व्यावसायिकांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी थेट मुख्याधिकारी गवळी यांची भेट घेतली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुकान भाडे, कामगार पगार, वीज बिले भरताना आर्थिक कोंडी होत आहे. शिवाय, घरखर्च भागवितानाही नाकीनऊ येत आहे. अवघ्या तीन दिवसांवर ईद, अक्षय तृतीया सण तोंडावर आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
यावेळी मुख्याधिकारी गवळी म्हणाल्या, शासनाने लॉकडाऊन केला आहे. यामध्ये बदल करू शकत नाही. मात्र, सभागृहापुढे प्रश्न ठेवून यातून मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी सुनील ताडे, युवराज शहा, अशोक पनपालिया, निर्मल पोरवाल यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.
फोटो - ११०५२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे मुख्याधिकारी टिना गवळी यांच्याकडे व्यापाऱ्यांनी भेट घेऊन कैफियत मांडली.