म्हाकवे : जिल्ह्यातील हजारो कुटुंबीयांसह हजारो एकरांतील पिकांना दरवर्षीच पुराचा फटका बसत आहे. याला जिल्ह्यातील नद्यांवर असणाऱ्या पुलांचे भरावही तितकेच कारणीभूत आहेत. या ठिकाणी भरावांऐवजी कमानी उभारण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५६ पुलांना सुमारे एक हजार कोटी निधीची तरतूद करून पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्वाभिमानीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी पुलाच्या भरावासंदर्भातही बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बस्तवडे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या भरावाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
सन २०१९ पेक्षाही यंदा वेदगंगा काठावरील गावांना आणि शेतीला फटका बसला आहे, याची दखल घेत शेट्टी यांनी या भागचा दौरा करून नागरिकांच्या भावना जाणून घेत उपाययोजनांचा पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नीतेश कोगनोळे, शिवाजी पाटील, माजी सरपंच साताप्पा कांबळे, दत्ता आरडे, उपसरपंच जयवंत पाटील, प्रवीण पाटील, संजय शिरगावे, विकास सावंत, रावसाहेब मुरदुंडे, आदी उपस्थित होते.
कॅप्शन-
वेदगंगा नदीवरील बस्तवडे पुलाची पाहणी करताना माजी खासदार राजू शेट्टी. यावेळी बाळासाहेब पाटील, नीतेश कोगनोळे व शेतकरी उपस्थित होते.
(छाया : दत्ता पाटील, म्हाकवे)