विजय कदम :
कणेरी : कोल्हापूर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असणारे कोगिल खुर्द हे गाव मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने संपर्कहीन झाले आहे. मोबाईल असूनही येथील ग्रामस्थांना कोणाशीच संपर्क करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरापासून जवळ असणाऱ्या या गावात मोबाईलचे टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.
कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ असणाऱ्या कोगिल खुर्दची १५०० च्या आसपास लोकसंख्या आहे. हे गाव डोंगरावरती वसले असले आहे. गावात प्रवेश केला की मोबाईलची रेंज गायब होते. त्यामुळे ग्रामस्थांचा इतरांशी संपर्क तुटतो. ग्रामस्थांना नातेवाईकांना संपर्क करावयाचा झाल्यास कंदलगाव किंवा गिरगाव हद्दीत जावे लागते. बहुतांश जणांकडे मोबाईल असूनही नेटवर्क मिळत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कोगिल खुर्दमध्ये मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.