म्हाकवे : म्हाकवेसह हरनाळ, आप्पाचीवाडी, भाटनांगनूर, कुर्ली, सौंदलगा येथील शेतकऱ्यांना उजव्या कालव्यातून पाणी मिळावे, यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ‘समझोता’ घडवून आणला. येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान, त्यांना पाणी मिळण्यास येणारे अडथळे, आदी बाबी देवणे यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्याप्रमाणे निढोरी ते म्हाकवे या उजव्या कालव्यातून प्रत्येक महिन्यातून १२ ऐवजी १५ दिवस पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.गेल्या दीड महिन्यांपासून या कालव्यात पाणीच आले नव्हते. गेल्या आठ दिवसांपूर्वी सोडण्यात आलेले पाणी म्हाकवेच्या हद्दीपर्यंत आल्यानंतर लगेचच बंद केले होते. त्यामुळे म्हाकवेकर सीमाभागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत होता.संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाबरोबर वाळलेल्या उसाची मोळीच अधिकाऱ्यांना दिली. यावेळी विजय डाफळे, आप्पासाहेब पाटील, निवृत्ती पाटील, अशोक पाटील, रामभाऊ चौगुले, महादेव चौगुले, बाबूराव साखरे, दीपक पाडेकर, दिलीप पाटील, संभाजी पाटील आदींसह सीमाभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
सीमावासीयांना पाणी मिळणार
By admin | Updated: December 16, 2014 00:13 IST