कोल्हापूर : जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या दोन ठिकाणच्या बॉम्बसदृश घटना हा निव्वळ खोडसाळपणाच्या आहेत. त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोचलो आहोत, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अधीक्षक बलकवडे म्हणाले, जयसिंगपूर येथे हॉस्पिटलमध्ये तर कुरुंदवाड येथे हॉटेलमध्ये बॉम्ब आढळल्याच्या खोडसाळपणाच्या घटना दोन दिवसांपूर्वीच घडल्या. मात्र हे बॉम्ब नसून प्लास्टिकच्या कांड्या आणि चिकटटेप होत्या. आम्ही तेथे बीडीएसचे पथक पाठविले होते. प्रत्यक्षात तेथे बॉम्ब नसल्याचे दिसून आले. त्यांच्या अभ्यासातही तेथे कोणतेही स्फोटक पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही घटनांच्या चौकशीसाठी स्वतंत्र पथके नेमकी आहेत. काहीजण जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले.
होळी, धुलिवंदन साधेपणाने करा...
देशात सर्वाधिक कोरोनाचा धोका असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे दुदैवाने महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. आगामी होळी व धुलिवंदन सण हे साधेपणाने साजरे करावेत. उत्साहाने रस्त्यावर उतरून कोणी अतिरेक केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निर्देश अधीक्षक बलकवडे यांनी दिले. या सणावेळी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.