लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : भाजप हा मजबूत पक्ष असून, वारस परंपरेला पक्षात अजिबात थारा नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष असून, पक्षात गुणवत्तेवर (मेरिट) निर्णय होतात. उद्योजक अशोक माळी यांनी पक्षात प्रवेश केल्याने हातकणंगले तालुक्यात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. त्यांचा निश्चितपणे सन्मान करून महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली जाईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
लाटवडे (ता. हातकणंगले) येथील सोमनाथ उद्योग समूहास भेट व उद्योग समूहाचे प्रमुख अशोक माळी यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक माने, अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, पंचायत समिती उपसभापती पूनम भोसले, माजी सभापती रेश्मा सनदी, नाना जाधव उपस्थित होते.
अशोक माळी म्हणाले, ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी विविध संस्थांची निर्मिती करून त्या काटकसरीने, प्रामाणिकपणे चालविल्या आहेत. जिथे जाऊ तिथे नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले. यापुढेही संस्थात्मक विस्तार करीत विकासाची चळवळ गतिमान केली जाईल.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या रूपाली माळी, गजानन सुभेदार, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू माळी, संतोष जाधव, किशोर पाटील, शुभम माळी, अर्जुन पाडळकर यांनी पक्षात प्रवेश केला.
स्वागत दिलीप पोवार यांनी केले. आभार सोमनाथ पतसंस्थेचे जनरल मॅनेजर कृष्णात माळी यांनी मानले.
फोटो ओळी- लाटवडे (ता.हातकणंगले) येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमनाथ उद्योग समूहाचे प्रमुख अशोक माळी यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी अशोक माने, अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, रूपाली माळी उपस्थित होते. (छाया-आयूब मुल्ला)