कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची निष्क्रियता स्पष्ट होत आहे. गोकुळच्या निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यामुळे भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांची निष्क्रियता लपवण्यासाठी पालकमंत्र्यांवर आरोप करण्याचा खटाटोप केला जात असल्याचा पलटवार सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संजय पोवार वाईकर, सचिन चव्हाण, किशोर खानविलकर, संपतराव पाटील, महंमद शेख यांनी पत्रकाद्वारे सोमवारी भाजपवर टीकास्त्र सोडले. पालकमंत्री सतेज पाटील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत हे जिल्ह्यातील जनतेला अवगत आहे, त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही सल्ले देण्याची गरज नाही, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गोकुळच्या निवडणुका पालकमंत्र्यांनी नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर घेण्यात आल्या होत्या हे भाजपच्या अंध भक्तांनी समजून घ्यावे. त्यात भाजपचे स्वयंघोषित नेते प्रचार करत नव्हते का..? की पराभवाच्या भीतीने सगळे नेते घरीच बसले होते काय? आज गोकुळबद्दल बोलणाऱ्यांनी त्यांना जाब विचारला का? अशी विचारणाही पत्रकात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या लाटेत जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसत आहेत. एका बाजूने कडक लॉकडाऊनची मागणी करतात आणि दुसरीकडे लॉकडाऊन काढा म्हणून दंगा करणाऱ्या भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाधितांचे आकडे समोर येत आहेत. कोल्हापुरात इतर जिल्हा व अन्य राज्यातील रुग्ण उपचार घेत असल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या वाढत आहे. जी रुग्णसंख्या आहे ती खरी आहे. गुजरात, उत्तरप्रदेशसारखी लपवाछपवी नाही. कारण भाजप शासन असणाऱ्या उत्तर प्रदेशातील गंगा नदीत हजारो कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहत होते त्यावेळी कोल्हापूरची पंचगंगा नदी ही निर्मळपणे वाहत होती हे सुद्धा भाजपच्या अंध भक्तांनी समजून घ्यावे असे या पत्रकात म्हटले आहे.