कागल : पेगासिस या इस्रायली कंपनीच्या तंत्रज्ञानाने देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या खाजगी जीवनाची हेरगिरी करण्याचे घटनाबाह्य काम मोदी सरकारने केले आहे. नऊ महिने शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करीत आहेत. त्याची दखल सरकार घेत नाहीत. महागाई गगनाला भिडली असून, जनता हालेहाल झाली आहे. त्यावर भाजपवाले बोलत नाहीत. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जनांदोलन सुरू करावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, सरचिटणीस अनिल साळोंखे, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील पंचायत समिती सभापती रमेश तोडकर, भय्या माने, शशिकांत खोत, सूर्यकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत मनोज फराकटे यांनी केले. ए.वा. पाटील, भय्या माने, शिवानंद माळी यांचीही भाषणे झाली. आभार रमेश तोडकर यांनी मानले.
(चौकट)
सगळेच ठेकेदार होऊ नका
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकासासारखे महत्त्वाचे मंत्रीपद जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आहे. प्रत्येक गावात विकासकामे सुरू आहेत. अजूनही निधी देणार आहे; पण म्हणून सगळे जणच ठेकेदार होऊन विकासकामांचा बट्ट्याबोळ करू नका, अशा कानपिचक्या मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
फोटो.
कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र विकास पाटील कुरूकलीकर यांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ए.वाय. पाटील, युवराज पाटील, मनोज फराकटे आदींची उपस्थिती होती.