लोकमत न्यूज नेटवर्क खोची : भेंडवडे येथील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले जाईल. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्याच्या अगोदर पुनर्वसित ठिकाणी हे लोक राहायला जातील, अशी व्यवस्था करण्यात येईल. या संदर्भातील आराखडा दोन महिन्यात तयार होईल. भेंडवडे हे गाव जिल्ह्यातील पुनर्वसनाचे मॉडेल ठरेल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
भेंडवडे येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. आमदार राजू आवळे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान खोची, बुवाचे वाठार येथील पूरग्रस्त भागाची पाहणीही केली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जुने घर सोडणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. गायरान जमिनीवर भूखंडाचे नियोजन करून तिथे विविध योजनेतून घरे बांधून ती नावावर केली जातील. पूरग्रस्तांची नुकसान भरपाई ही त्यांच्या बँक खात्यावर शासन जमा करणार आहे. १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ किलो तूर डाळ व ५लिटर रॉकेल वाटपाचे काम सुरू झाले आहे.’’
यावेळी नुकसान भरपाईचे पंचनामे व्यवस्थित करून पात्र असणारे कोणीही वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्या. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घरे, शेती यांची माहिती घ्या, अशा सूचना आमदार राजू आवळे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सर्जेराव माने यांनी पूरग्रस्तांच्या अडचणींची माहिती दिली. यावेळी सरपंच काकासो चव्हाण, अभिजित माने, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, बाळासाहेब माने, कृष्णात वासुदेव, हर्षवर्धन चव्हाण, सचिन चव्हाण, कपिल पाटील, भगवान जाधव, डॉ.विजय गोरड, एस.एम.पाटील, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार प्रताप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, मंडल अधिकारी गणेश बर्गे आदी उपस्थित होते.
खोची येथील पूरग्रस्तांनी पालकमंत्री पाटील यांना गायरानातील भूखंड मिळावेत, अशी मागणी केली. खोची दूधगाव पुलाच्या भरावामुळे पाण्याची फूग वाढून मोठे नुकसान झाले आहे. तो भराव काढून कमान पद्धत करावी, अशी मागणी केली.
यावेळी सरपंच जगदीश पाटील, एम.के.चव्हाण, अजय पाटील, सुशेनराव शिंदे, भैरवनाथ पवार, प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. बुवाचे वाठार येथे सरपंच रीना शिंदे, उपसरपंच शंकरराव शिंदे, मदन अनुसे आदी उपस्थित होते.
३१ भेंडवडे सतेज पाटील
फोटो ओळी-भेंडवडे येथे पूरग्रस्त पाहणीवेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजू आवळे, काकासो चव्हाण, प्रांताधिकारी विकास खरात, प्रदीप उबाळे, सर्जेराव माने, अभिजित माने उपस्थित होते.(छाया-आयुब मुल्ला)