लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचा अखेर वीस वर्षानंतर पांग फिटला. मोठमोठे खड्डे आणि पाण्यामुळे रोज तीन-चार अपघात व्हायचे. मात्र ग्रामपंचायतीने ड्रेनेजसह रस्त्याचे मजबुतीकरण केल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
फुलेवाडी, जिल्हा परिषद कॉलनी, साने गुरुजी कॉलनीसह त्या भागात जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचा वापर केला जातो. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या निधीतून २००० साली तत्कालीन पंचायत समिती सदस्य मधुकर जांभळे यांनी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केले होते. अलीकडे या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने रस्त्यांवर खड्डे आणि दलदलीचे साम्राज्य पसरले होते. ड्रेनेज लाईन नसल्याने परिसरातील कॉलन्यांचे पाणी थेट रस्त्यात येत असल्याने वाहने चालविताना जीव मुठीत घेऊनच चालवावी लागतात. बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे व सदस्यांनी नवीन ड्रेनेज लाईन टाकून रस्ता मजबुतीकरण केल्याने वीस वर्षांनंतर रस्त्याचा पांग फिटल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
कोट-
अनेक वर्षे व्यथा मांडूनही कोणी लक्ष देत नव्हते. मात्र सरपंच मयूर जांभळे व सदस्यांनी रस्त्याचे काम केल्याने आमची सोय झाली आहे.
- अविनाश लाड (नागरिक, महालक्ष्मी कॉलनी)
फुलेवाडीसह परिसरातील कॉलन्यांसाठी जवळच्या असणाऱ्या रस्त्याची खूपच दुर्दशा झाली होती. आता ड्रेनेजसह मजबुतीकरण केले. भविष्यात डांबरीकरणासाठी प्रयत्न करू.
- मयूर जांभळे (सरपंच, बालिंगे)
फोटो ओळी : कोल्हापुरातील बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचे तब्बल २० वर्षांनंतर मजबुतीकरण करण्यात आले. (फाेटो-२३०५२०२१-कोल- बोंद्रेनगर)