आजही भारतात दोन तृतीयांश लोक कृषी व्यवसायात आहेत. यामध्ये मोठा वाटा भूमीहीन मजूरांचा आहे. भूमीहीन मजूरही एखादे- दुसरे दुभते जनावर (गाय/म्हैस) पाळतात. अशा गरीबाकडील दूध संकलन आणि वाटपाची पध्दती कार्यक्षम नव्हती. ग्राहकांची संख्या मोठी असूनही अव्यवस्थेमुळे देशभर दुधाची टंचाई भासत होती. वाढते शहरीकरण तर या समस्येला भीषण रुप देत होते. दुग्धजन्य पदार्थांची आयात करावी, अशी परिस्थिती असताना ‘विसाव्या शतकातील एक सर्वश्रेष्ठ कृषी क्षेत्रातील नेतृत्व’ उदयाला आहे. ते म्हणजे वर्गीस कुरियन! त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना संघटीत केलं.वर्गीस कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी कालिकत येथे झाला. त्यांचे वडील कोचीनमधील प्रख्यात सर्जन होते. वर्गीस कुरियन यांनी प्रथम पदार्थविज्ञान शास्त्रात बी.एस्सी. ही पदवी चेन्नई येथील प्रसिध्द लॉयला महाविद्यालयातून मिळवली. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी मिळवितानाच ते टाटा स्टिलमध्ये रुजू झाले. १९४६मध्ये त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी मिशिगन विद्यापीठात जाण्यासाठी भारत सरकारने शिष्यवृत्ती दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुन ते १९४९ मध्ये भारतात परतले. शिष्यवृत्तीच्या अटीनुसार सरकारने त्यांची आनंद येथील सरकारच्या दुधाची भुकटी तयार करावयाच्या प्रकल्पात नियुक्ती केली. आनंद आज सर्व भारतवासियांना माहित झालेले गाव असले तरी त्याकाळी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील एक खेडे होते. तेथे मोठ्या अनिच्छेनेच वर्गीस रुजू झाले. मेपासून आनंद येथील कामास सुरुवात केली. पण हे काम सोडून जावे, असा अनेकदा त्यांच्या मनात विचार यायचा. मात्र त्या प्रकल्पाचे पालकत्व सांभाळणारे त्रिभुवनदास पटेल यांनी वर्गीस कुरियन यांचे मन वळविले आणि नंतर वर्गीस हे आनंद येथेच रमले. त्याठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना जागृत केले.त्रिभुनवदास पटेल आणि वर्गीस कुरियन यांनी खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संघटीत केले. त्यांच्या सहकारी सोसायट्या सुरू केल्या. दुधाचे संकलन आणि त्याची डेअरीपर्यंतची वाहतूक यामध्ये शिस्त आणली. त्याचवेळी आनंद येथील प्रकल्पात म्हशीच्या दुधाची पावडर तयार करण्याचे तंत्र विकसित होत होते. त्यामध्ये कुरियन यांच्या सहकाऱ्यांना यश मिळाले आणि भारतीय दुधाच्या पावडरने नेस्ले यासारख्या मातब्बर कंपनीला मात देत ‘अमूल’ हा ब्रँड पुढे आणला. आनंद येथील प्रकल्पाचे यश पाहून वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन केले आणि आनंदच्या धर्तीवर दुधाच्या क्षेत्रात सहकार चळवळ उभा करण्याचे कार्य सुरू झाले. याच्याच दुसऱ्या टप्प्यात ‘दुधाचा महापूर योजना’ सुरू झाली आणि भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. यामध्ये वर्गीस यांनी कोणताही नवीन शोध लावला नसला तरी कुशल संघटन आणि अत्युत्कृष्ट व्यवस्थापन यांच्या जोरावर भारतीय शेतकऱ्यांचे हित साधत त्याला एक चांगल्या प्रगतीच्या दिशेवर आणले. त्यांच्या यश कार्याचा गौरव करीत त्यांना १९८९ मध्ये वर्ल्ड फूड प्राईझ देण्यात आले. भारत सरकारने पद्मविभूषण पारितोषिक दिले. १९६३ मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी ९ सप्टेंबर २०१२ रोजी गुजराथमधील नडियाड येथे त्यांचे निधन झाले. भारतातील दुधवाला बाबा म्हणून त्यांची आठवण मात्र चिरंतन आहे. कुरियन यांनी केलेलं कार्य हे आजही त्यांच्या रुपाने अमर राहिलं आहे. - डॉ. व्ही. एन. शिंदे उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वर्गीस कुरियन
भारतातील दुधवाला ‘बाबा’
By admin | Updated: June 1, 2015 00:14 IST