गारगोटी : दोन तपाहून अधिक काळ ग्रामीण समाजाच्या विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांना नवी दिल्लीच्या ‘इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी’चा राष्ट्रीय भारत ज्योती गौरव पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. खासदार डॉ. शशिकला पुष्पा रामास्वामी यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्यानंतर हा पुरस्कार मिळालेले ते कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी व्यक्ती आहेत.
यावेळी जीवन पाटील म्हणाले, माझ्या विविध कामांची दखल घेऊन मला या संस्थेने दिलेला हा राष्ट्रीय पुरस्कार मला या समाजसेवेची अधिक प्रेरणा देत राहील. आगामी काळात अधिक काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग, राष्ट्रीय लोकदलचे सचिव त्रिलोक त्यागी, राजस्थान विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रामास्वामी, फ्रेंडशिप सोसायटीचे सचिव गुरुप्रीत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी भरवलेले भव्य पशु-पक्षी व कृषी प्रदर्शन, शेती सेवा केंद्राद्वारे ना नफा ना तोटा तत्त्वावर वेगवेगळी खते, औषधे, बी-बियाणे, आकुर्डे जि. प. मतदार संघात केलेली विकासकामे, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके वाटप, अनेकांचा सत्कार, शिक्षण, सहकार, अर्थ, उद्योग, ग्रामीण विकास, शालेय शिक्षण, शेती, आरोग्य अशा सर्वच माध्यमातून केलेल्या सर्व कामांची दखल या संस्थेने घेऊन हा पुरस्कार दिला आहे.
फोटो ओळ
सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार खासदार शशिकला रामास्वामी यांच्याहस्ते स्वीकारताना मध्यभागी जीवन पाटील, सोबत गुरुमित सिंग, गुरुप्रीत सिंग, डॉ. रामस्वामी आदी.