कोल्हापूर : जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना कनिष्ठ अभियंत्याच्या पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उसन्या नवऱ्यांना घालवा, अशी मागणी रविवारी झालेल्या राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. त्यावर शासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाचे सरचिटणीस आर. एम. लेडांगे यांनी दिले. येथील कागलकर हाऊसमध्ये सभा झाली. संघाचे राज्य कार्याध्यक्ष आर. एस. ठाकूर अध्यक्षस्थानी होते. ठाकूर म्हणाले, जीवन प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता म्हणून प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. केवळ कोल्हापूर जिल्ह्णात २२ तर राज्यात २४३ जीवन प्राधिकरणाकडील कनिष्ठ अभियंता काम करत आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांना कनिष्ठ अभियंता म्हणून बढती मिळालेली नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंता या उसन्या नवऱ्यांना घालविण्यासाठी राज्य संघाने प्रयत्न करावेत. जीवन प्राधिकरणाकडून कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मानगुटीवरील भुतास दूर करणे गरजेचे आहे. लेडांगे म्हणाले, संघाच्या जिल्हा शाखेने सक्रियपणे काम करण्याची गरज आहे. मात्र, अनेक जिल्ह्णांतील संघाचे पदाधिकारी काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जे काम करणार नाहीत त्यांनी पदावरून दूर व्हावे. जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागांतील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध मागण्यांसंबंधी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास उच्च न्यायालयात लढा देण्याचे नियोजन केले आहे. क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातील हजेरीपत्रकावर सही करणे शासनाने बंधनकारक केलेले नाही. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी सकाळी ८ ते २ आणि २ ते ६ असे काम करण्याची वेळ आहे. प्रत्येकाने पन्नास टक्के तरी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. गजानन लोखंडे, उदय कांबळे, चेतन वाघमारे, एस. बी. कोरे, अशोक शिंदे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सर्व प्रश्नांची उत्तरे लडांगे यांनी दिले. जिल्हाध्यक्ष जे. एन. वसगडेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष आर. जी. पाटील, सचिव सी. एस. लोंढे यांच्यासह विविध राज्यांतून पदाधिकारी उपस्थित होते. आक्षेप असलेलेच अध्यक्ष..ठाकूर यांना कनिष्ठ अभियंतापदी बढती मिळाली आहे तरीही स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाच्या संवर्गातून राज्य कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ठाकूर यांची नियुक्ती झाल्याचा आक्षेप आहे. हा आक्षेप लडांगे यांच्यासमोर शनिवारी जिल्हा पदाधिकाऱ्यांतील काहींनी सांगितला. विषयपत्रिकेवरही हा विषय होता तरीही सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी ठाकूर यांचीच निवड झाली. त्याची सभेच्या ठिकाणी कुजबूज सुरू होती. कोल्हापुरातील कागलकर हाऊसमध्ये रविवारी झालेल्या राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाच्या सर्वसाधारण सभेत सरचिटणीस रा. म. लेडांगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर डावीकडून सी. डी. कुलकर्णी, आय. जी. अन्सारी, नारायण खतकर, व्ही. आर. दावरे, जे. एन. वसगडेकर, आर. एस. ठाकूर उपस्थित होते.
जीवन प्राधिकरणच्या उसन्या ‘नवऱ्यां’ना घालवा
By admin | Updated: May 23, 2016 00:57 IST