आजरा : आजरा तालुक्याची स्वत:ची अशी नाट्यपरंपरा आहे. आजरा गाव हे नाटकाचे वेड जोपासणारे गाव आहे. नाट्यशास्त्र विभागातून व स्थानिक मंडळांकडून तयार होणाऱ्या नाट्यकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होण्याची गरज असून एखादे नाट्यविद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी केले.नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक अशोक चराटी होते. कुलकर्णी यांच्याहस्ते नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.कुलकर्णी म्हणाले, समांतर नाटक, दलित नाटक, कौटुंबिक नाटक, सामाजिक नाटक असे नाटकाचे विविध प्रकार सांगितले जात असले तरी चांगले नाटक आणि वाईट नाटक असे दोनच प्रकार आपणाला माहीत आहेत. रमेश टोपलेसारख्या नाटकाची प्रचंड जडण असणाऱ्या माणसाच्या अकाली निधनाने प्रचंड हानी झाली आहे. नवनाट्यने व डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांच्यासारख्या नव्या दमाच्या मंडळींनी आजऱ्याची नाट्य चळवळ पुढे देण्यासाठी प्रयत्न करावेत.अशोकअण्णा चराटी म्हणाले, नाट्यचळवळ पुढे नेण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. नाट्य विद्यापीठ आजरा येथे व्हावे यासाठी प्रयत्न जरूर केले जातील, असे सांगितले.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे अध्यक्ष एम. एल. चौगुले, मिनर्वा गु्रपचे सुरेश होडगे, प्रकाश वाटवे, अन्नपूर्णादेवी चराटी, आय. के. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चंद्रशेखर फडणवीस यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. सुधीर मुंज यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होण्याची गरज
By admin | Updated: January 10, 2015 00:26 IST