कोल्हापूर : गणेशोत्सवातील गर्दी टाळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून घरगुती गणपती विसर्जनासाठी शहराच्या विविध भागात १६० कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपापल्या भागातच मूर्तींचे विसर्जन करून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाने जाहीर केलेले नियम पाळावेत, आगमनाची मिरवणूक, विसर्जनास होणारी गर्दी टाळून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही बलकवडे यांनी यावेळी केले.
महापालिकेमार्फत शहरात नागरिक, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्या सहयोगाने शहराच्या विविध भागात घरगुती गणेश विसर्जनासाठी १६० कृत्रिम कुंड तयार करण्यात येत आहेत. अशा कुंडातच मूर्ती विसर्जित कराव्यात. विसर्जित मूर्ती नंतर इराणी खणीत सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी ९० टेंपो, ट्रॅक्टर, प्रत्येक वाहनावर दोन कर्मचाऱ्यांसह पालिकेचे २०० कर्मचारी, चार जेसीबी अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.
विसर्जनाच्या ठिकाणी सहा वैद्यकीय पथके, विद्युत पथके, स्वच्छता पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय निर्माल्य गोळा करण्याकरिता बारा पथके तयार केली आहेत. आरोग्य विभागाचे ३०० कर्मचारी या पथकात असतील. निर्माल्य गोळा करून खत निर्मितीसाठी देण्यात येणार आहे.
शहराची स्वच्छता, कोरोनापासून बचाव याकरिता जनजागृती करणाऱ्या देखाव्यांसाठी महापालिकेने स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळांनी आपापल्या परिसरात ही जनजागृती करायची आहे. त्याकरिता विजेत्या मंडळांना प्रशस्तीपत्रक, गौरवचिन्ह देण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.
- सहा मंडळांना नोटीस -
शहरातील सहा मंडळांनी निश्चित केलेल्या दहा बाय दहा साईजपेक्षा जादा आकाराचा मंडप घातला होता. त्यांना विभागीय कार्यालयामार्फत नोटीस देऊन मंडपाचा आकार कमी करण्यास सांगण्यात आले, असे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले.