कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणूक रणांगणात उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा प्रचारातील जोर वाढला आहे. अद्यापही वैयक्तिक गाठीभेटी, बैठका यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला जात आहे. सध्या आक्रमक भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेच्या वाघांनी आरोप लगावण्यात आघाडी घेतली असून, परिणामी भाजपचे नेते पुरते घायाळ झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रचाराने गती घेतली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचण्यावर व आपली भूमिका मांडण्यावर सर्वाधिक जोर आहे. प्रचारात रंगत भरत चालली असल्याने शहरातील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले आहे. महापालिका निवडणुकीत युती करण्याचे पहिल्यापासून टाळल्यामुळे शिवसेनेचा भाजपविरुद्धचा संताप चांगलाच वाढला आहे. त्यामुळे सेनेचे नेते आक्रमक भूमिकेत दिसतात. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मटक्यासह अन्य अवैध धंद्यांशी संबंध असलेल्यांना उमेदवारी दिल्याचा भाजपवर थेट आरोप लगावला. सेनेच्या आरोपांमुळे भाजपचे नेते घायाळ झाले आहेत. दसऱ्यानंतर तोफा धडाडणार बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा दसरा झाल्यानंतर म्हणजेच शुक्रवार (दि. २३) नंतर होणार आहेत. कॉँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पतंगराव कदम, रमेश बागवे, आमदार प्रणिती शिंदे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या तोफा धडाडणार आहेत. भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ किंवा २९ आॅक्टोबर रोजी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्याशिवाय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सभा होणार आहेत.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व मंत्री रामदास कदम, आदी नेतेही येणार आहेत. त्यामुळे पुढील आठवडा आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजणार आहे.
सेना आक्रमक; भाजप घायाळ
By admin | Updated: October 20, 2015 23:47 IST