कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत. मात्र, याठिकाणी आदेशांचे उल्लंघन करून व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे बुधवारी (दि. १४) उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते.तावडे हॉटेल प्रकरणी अधिकाऱ्यांचे संगनमत आहे; त्यामुळे अतिक्रमणाच्या कारवाईतून मोठे मिळकतधारक वाचले. त्यावेळी झालेली टंकलेखनातील चूक आता तरी सुधारली आहे का? असा सवाल उपस्थित करून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मिळकतधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत, अशी उत्तरे देण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न करताच अशी छापील उत्तरे किती दिवस देणार आहात? असा जाब सदस्यांनी विचारला. अधिकारी नगरसेवकांच्या तोंडाला पाने पुसत असून मिळकतधारक व महापालिका अधिकारी यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप बैठकीत सदस्यांनी केला. न्यायालयाने आदेश देऊनही बांधकाम होत असेल तर तातडीने न्यायालयात जाऊन अवमान याचिका दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली.यासंबंधीच्या न्यायालयीन कामकाजास महापालिकेचे वकील जाणीवपूर्वक गैरहजर राहतात, असाही आक्षेपही सदस्यांनी नोंदविला. वकिलांच्या गैरहजर राहण्यावरही शंका येऊ लागली असून, ते का गैरहजर राहतात याची चौकशी करण्याची मागणीही सदस्यांनी केली. बैठकीतील चर्चापात्र सफाई कर्मचाऱ्यांना राजीव आवास योजनेतील घरे देण्याची प्रक्रिया सुरू असून, उपलब्धतेनुसार ४० कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली आहेत, केएमटीच्या नवीन बसची तिसरी चाचणी पुढील आठवड्यात होणार आहे, एनसीसी ते मोरेवाडी जकात नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहे, तसेच रंकाळा प्रदूषण मुक्तीबाबत पुढील बैठकीत अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली.
तावडे हॉटेलप्रकरणी अवमान याचिका
By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST