लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’साठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर माघारीस सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या पाच दिवसात केवळ चारच माघार झाल्या आहेत. सोमवारी संघाच्या संचालिका अनुराधा पाटील-सरूडकर यांनी सर्वसाधारण गटातून माघार घेतली.
‘गोकुळ’च्या दाखल अर्जांची ५ एप्रिल रोजी छाननी झाल्यानंतर ६ एप्रिलपासून माघारीस सुरुवात झाली आहे. दोन्ही पॅनेल तगडी होणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. पॅनेलमध्ये संधी मिळेल या आशेपोटी प्रत्येकाने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या पाच दिवसात अरुण नरके, स्निग्धा नरके व पद्मजा आपटे यांनी अर्ज मागे घेतले. सोमवारी अनुराधा पाटील-सरूडकर यांनी सर्वसाधारण गटातून माघार घेतल्याने त्यांची महिला गटातून उमेदवारी निश्चित आहे. आज, मंगळवार व उद्या, बुधवारी दोन दिवस शासकीय सुटी असल्याने गुरुवार (दि. १५) पासून माघारीस वेग येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा दोन दिवस सुटी असल्याने १९ व २० एप्रिल रोजी माघारीसाठी झुंबड उडणार आहे.
डमी अर्जांचीही शेवटच्या टप्प्यातच माघार
विद्यमान संचालकांसह इच्छुकांनी दोन-तीन डमी अर्ज दाखल केले आहेत. काहींनी दोन गटातून अर्ज दाखल केल्याने कोणत्या गटातून उमेदवारी मिळते, हे पाहूनच अर्ज माघारीचा निर्णय होणार असल्याने डमी अर्जांची शेवटच्या दोन-तीन दिवसात माघारी होईल.