कुरुंदवाड : शहरातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून, अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांनी अँटिजन तपासणी (कोरोना चाचणी) करून घेणे बंधनकारक केले आहे. ज्याच्याजवळ अँटिजन तपासणी अहवाल नसेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.
कडक लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आज, सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल करीत सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील पालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या व्यावसायिकांनी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त करणे बंधनकारक केले आहे. पालिका कर्मचारी, पोलीस व्यावसायिकांकडे कोरोना चाचणी अहवाल मागितल्यास व ते व्यावसायिकाकडे नसल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.