कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या कर्ज रक्कम भरण्याची तयारी असल्यास हप्ते पाडून पुनर्गठन करण्यास तयार असल्याची भूमिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली आहे. याप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती.
ठाकरे यांनी बैठकीमध्ये हसन मुश्रीफ यांना पुढाकार घेऊन आजरा साखर कारखान्याचा प्रश्न संपवण्याची सूचना केली होती. सध्या कारखान्याचे ७८ कोटी रुपये कर्ज असून, केंद्र शासनाकडून १३ कोटी रुपये मिळणार आहेत; तर १७ कोटींची साखर शिल्लक आहे. उर्वरित ५० हून अधिक कोटींचे जिल्हा बँकेचे कर्ज भरण्याची गरज आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती.
मुश्रीफ म्हणाले, मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी ही रक्कम भरण्याबाबत तयारी दर्शवावी. त्यांना जिल्हा बँक हप्ते पाडून देईल. मी माझ्याकडून सहकार्य करण्यासाठी तयार आहे. याबाबत दोन्ही मंत्र्यांशी बुधवारी चर्चा होणार होती; परंतु ती झाली नाही. आता एकनाथ शिंदे हे शुक्रवारी कोल्हापुरात येणार आहेत. त्यावेळी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करू.